प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राची उत्तुंग कामगिरी
नवी दिल्ली : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील (पीएमएफएमइई) 'बीज भांडवल' (Seed Capital) घटकाच्या अत्यंत प्रभावी अंमलबजावणीबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला (उमेद) राष्ट्रीय स्तरावरील ‘Best Performance State’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथील 'इंडिया हॅबिटॅट सेंटर' (India Habitat Centre) येथे आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते हा गौरवपूर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा राष्ट्रीय पुरस्कार 'उमेद' अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील यांनी स्वीकारला. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी उमेद अभियानाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले.
पुरस्काराची ठळक वैशिष्ट्ये आणि महाराष्ट्राची कामगिरी
३८ हजार महिलांना आर्थिक आधार: उमेद अभियानाने गेल्या पाच वर्षांत PMFME योजनेच्या अंतर्गत राज्यातील ३८,००० स्वयं सहाय्यता समूहातील सदस्यांना सुमारे १३६ कोटी रुपयांचे बीज भांडवल यशस्वीरीत्या वितरित केले आहे.
ग्रामीण महिला उद्योजकतेला चालना: या मिळालेल्या बीज भांडवलाच्या मदतीने ग्रामीण भागातील हजारो महिलांनी स्वतःचे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. यामुळे महिलांना नियमित उत्पन्न, रोजगार आणि स्वावलंबनाची शाश्वत संधी उपलब्ध झाली आहे.
राष्ट्रीय स्तरावर दखल: महाराष्ट्रात 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना शाश्वत उपजीविकेकडे नेण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा करण्यात आली.
हा पुरस्कार म्हणजे राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवणाऱ्या स्वयं सहाय्यता समूहातील सर्व कष्टकरी महिलांच्या उल्लेखनीय परिश्रमांची पोचपावती आहे. या पुरस्कारामुळे राज्यभरातील आमच्या भगिनींना अजून जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. उमेद अभियानाच्या महिलांना प्रेरणा मिळून १ कोटी लखपती दीदी बनविण्याच्या संकल्पाला हातभार लागणार आहे. असल्याचे मत अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.


